दिनांक ४ डिसेंबरची एक अत्यंत प्रसन्नतेची आणि निरामय आनंदाची, आपल्यातील ईश्वरी चैतन्याची जाणीव करून देणारी सकाळ. निमित्त होतं संजीवनी परिवाराने भाउसाहेब वर्तक विद्यामंदिरात आयोजित केलेला “विद्यार्थी – पालक मेळावा”. मंथन ह्या कार्यक्रमात झालेल्या चर्चेअंतर्गत आयोजलेला हा दूसरा मेळावा. ह्या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते. श्री संदीपकुमार साळुंखे सर, सहायक आयकर उपायुक्त, पुणे. एकेकाळी रस्त्यावरील शेण गोळा करून गोवर्या रचणारा ग्रामीण युवक ते यशस्वी आयकर उपायुक्त. १९९२ च्या SSC परीक्षेत ते पुणे बोर्डातून पहिले आले. ९४ ला HSC सायन्समध्ये पुणे बोर्डातून तृतीय क्रमांकाने उतीर्ण झाले. पुण्यातील शासकीय विद्यापीठातून BE (Mech) च्या परीक्षेत चौथे आले. कॅम्पस- मधुनच त्यांची बजाज ऑटोमध्ये सहायक प्रॉडक्ट मॅनेजेर म्हणून निवड झाली. नोकरी करीत असताना त्यांनी MPSC, UPSC च्या स्पर्धा परीक्षा दिल्या. त्यात यशस्वी होऊन MPSC द्वारा ते जळगाव जिल्ह्याचे CEO झाले पुढे UPSC द्वारा सहाय्यक आयकर उपायुक्त म्हणून नेमणूक झाली. हा सगळा प्रवास सुरु असताना आपल्या गावातील, विभागातील छोट्या भावंडासाठी स्पर्धापरीक्षा व मार्गदर्शन केंद्र सुरु केले. अशा प्रयत्नातून त्यांनी अनेक तरुणांच्या मनातील अंतर्ज्योत जागृत केली.
मोठ्या भावाने लहान भावंडाशी केलेले हितगुज
मी दुरून आलो त्यात विशेष काही नाही, कोणालाही चांगलं काही देऊ शकलो तर ती निसर्गाने आपल्याला दिलेली देणगी आहे असे समजतो.एखाद्या विद्यार्थ्याची, पालकाची, वा शिक्षकाची अंतर्ज्योत पेटवू शकलो तर ते माझं भाग्य समजतो. मला खुप आमंत्रण येत असतात ती स्वीकारताना, आतंरिक तळमळ किती आहे हे जाणून घेण्याचा माझा प्रयत्न असतो. ग्रामीण भागातील मुलांची कष्ट व अभ्यास करायची तयारी असते. फक्त त्यांना कर म्हणणारा असं कोणीतरी भेटायला हवा. त्याच्या मनातील अंतर्ज्योत पेटवली की झालं. ही ज्योत न पेटण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्यात प्रचंड प्रमाणात असलेला न्यूनगंड. त्यांना वाटत हे माझ्या आवाक्यात नाही, हे करणे मला शक्य नाही, हे काम माझे नाही असे सारखे वाटत रहाणे.
मला दहावीत प्रथम आलेलो आहे असं सांगणार्या अधिकार्यालाच माझा प्रश्न होता की तुम्ही हे कश्यावरुन सांगता? म्हणजेच माझा हा प्रश्न न्यूनगंडातून आला होता. न्यूनगंड तर आपल्या सगळ्यातच असतो फक्त त्यावर मात करून स्वत;ला स्वत; शोधणं खुप आनंददायी असते. पालकांना व शिक्षकाना माझी एक नम्र विनंती आहे की, मुलं फार मोठी स्वप्न पाहत असतील तर त्यानां पाहुद्या. कदाचित तीच स्वप्न त्याला उच्च स्तरावर घेउन जात असतील, नाहीतर काही करायचं बळ देत असेल तर त्यांना स्वप्न जरूर पाहू देत. जशी जशी प्रगल्भता वाढत जाईल तसं तसं त्याना कळत जाईल. अभ्यास करायचा आहे तर प्रचंड मन लावून करायला हवा. कुठलीही वाचलेली, अभ्यासलेली गोष्ट कधीच वाया जात नाही. आपल्या प्रामाणिक प्रयत्नाला पहिल्यांदा विरोध होतो, विरोधाला न जुमानता पुढे जाता तेव्हा उपहास होतो, उपहासाला भीक घातली नाही की कुतूहल होते आणि कुतूहल नंतर येते कौतुक. अभ्यासाकडे खुप गंभीर पणे पहा. मला ज्ञान मिळाले पाहिजे अशी दृष्टी ठेवा.
आपल्या अभ्यासाला, आपल्या कामाला महत्व द्या. आपण जे काम परत परत करतो त्याच एक शास्त्र होतं. अभ्यासाच एक शास्त्र झाले पाहिजे. अभ्यासाचे वेळापत्रक, वाचनाचं कौशल्य, लिहण्याची कला, स्मरण करण्याच शास्त्र , उजळणी (रीविजन) कशी करावी आशा पद्धतीने आपण विकसित करायला हव्यात. प्रत्येक घरात एक ज्ञान यज्ञ पेटला पाहिजे. आपलं घर निम्नस्तरीय करमणुक केंद्र झाली आहेत. टिव्ही, वीसीआर, वृत्तपत्रे, मोबाइल इत्यादि नको असे नाही, परंतु किती प्रमाणात असावे? किती घरात अभ्यासाची चर्चा होते. शिक्षण आपल्या जगण्याचा भाग झाला पाहिजे. मसीहा येईल आणि सर्व बदलून जाईल अस नाही, तर आपल्याला आपल्या स्तरावर अवतार व्हावं लागेल प्रत्येकाने मोठं काम केले पाहिजे असे नाही. कोणतीही गोष्ट वाया जात नाही. दृश नाही तर अदृश्य फळ मिळतेच. आपण स्वत;ला फसवू शकत नाही, स्वत:ला विचारा खरंच मला ही गोष्ट करायची आहे का ?. निरोगी समाजासाठी काही गोष्टी बिझिनेसच्या बाहेर ठेवावयास हव्यात. शिक्षण हा व्यवसाय न होता सर्वाना मुक्त हवे.
गुरु रविन्द्रनाथाची कविता आहे.
जिथे मन भीतीमुक्त आहे आणि मान ताठ आहे
जिथे ज्ञानाची कवाडे सर्वांना सदैव खुली आहेत.