स्वच्छतेसाठी लोकांचा सहभाग महत्वाचा – स्वछता अभियान २०१८
लोकांच्या सहभागाने सार्वजनिक ठिकाणे आपण अधिक स्वच्छ ठेवू शकतो. कोणतेही काम लोकांचा सहभाग असल्यास यशस्वी होते. महापालिका आपले स्वछता ठेवण्याचे काम करतेच, परंतु स्वछता राखण्यासाठी प्रत्येक भागात तेथील स्थानिक नागरिकांचा सहभाग खूप महत्वाचा आहे असे प्रतिपादन वसई-विरार महानगरपालिकेच्या नगरसेविका रंजना थालेकर यांनी केले.
वसईतील संजीवनी परिवार आयोजित स्वछता अभियानात त्या बोलत होत्या. संजीवनी परिवाराने वटार समुद्र किनारी स्वछता अभियान आयोजित केले होते. संजीवनी परिवाराच्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले व नवापूर परिसरात लोकसहभाग वाढवून स्वछता अभियान राबवण्याचा मानस व्यक्त केला. स्वछता मोहीम एक दिवस न राहता कायम समुद्र किनारे स्वच्छ राहण्यासाठी स्थानिकांचा सहभाग महत्वाचा आहे, लोकांनी स्वच्छतेला अशीच साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
रामनवमीचे औचित्य साधून संजीवनी परिवारातर्फे वटार समुद्र किनारी सकाळी ६:३० ते ९:३० दरम्यान स्वछता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारचा दिवस असूनही तरुणाई मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी झाली. आपली सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ राहावी, आनंद मिळविण्यासाठी आपण समुद्र किनारी येत असतो तो परिसर एकदम स्वच्छ असावा त्याची जाणीव आपल्या सर्वांनी ठेवायला हवी म्हणून असे उपक्रम संजीवनी परिवार आयोजित करते अशी भूमिका हेमंत नाईक यांनी मांडली. कार्यक्रमाला रामदास मेहेर, वसंत पाटील, मनोहर पाटील, सुधाकर नाईक, कमलाकर पाटील, राजू नाईक उपस्थित होते.
अभियान यशस्वी करण्यासाठी श्री राजू नाईक वटार, निनाद नाईक, आनंद पाटील, मयूर नाईक, किशोर वझे, प्रलोभ म्हात्रे, सतिश पाटील व सुनील म्हात्रे यांनी विशेष मेहनत घेतली.