!!! १९९८ ते २०२१ काश्मीर सेवा यज्ञ !!! – श्री. अधिक कदम

राज्यशास्रात मास्टर डिग्री घेतलेले अधिक कदम मूळचे नगरचे. यांचे शिक्षण पुण्यात झाले .शस्रसंघर्षात होरपळलेल्या मुलासंबंधी सर्वेक्षण करण्यासाठी १९९६ साली केलेला जम्मू काश्मीरचा दौरा निमित्त ठरुन “बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशनची” स्थापना झाली. या संस्थेचे संस्थापक म्हणून अधिक कदम गेली २५ वर्षे जम्मू काश्मीरमध्ये कार्यरत आहेत. दोन वर्षाच्या बालिकेपासून ते अठरा वर्षाच्या मुलींना बालिकाश्रमाच्या माध्यमातून आधार देत आहेत, त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करून सक्षम करत आहेत .
कारगिल युद्धात विस्थापितांना मदतीचा हात देण्यात यांचा मोठा वाटा होता .शांततेच्या प्रक्रियेत स्रियांचं सक्षमीकरण खूप महत्वाचं मानून त्यासाठी पंचवीस वर्षे सातत्याने प्रयत्न करत आहेत .यामध्ये १२३ मुलींची लग्न करुन समाजात पाठवले. यातीलच सात मुलींनी आतंकवादी गटात सामील असलेल्या आपल्या दिरांना मूळ प्रवाहात परत आणले हा आतापर्यंतचा खूप मोठा पुरस्कार आहे असं श्री. अधिक कदम मानतात .
त्यांना आतंकवादी, धर्मगुरू यांच्याशी अनेकवेळा सामना करावा लागला . १९ वेळा जीवावर बेतलं असताना त्यातून सुटका झाली त्याचं श्रेय अनेकांच्या शुभेच्छा, आशीर्वाद याला देतात, इतकी नम्रता श्री. अधिक कदम यांच्यात आहे .३० वर्षे सुरु असलेला आतंकवाद संपण्यासाठी विश्वासाहर्ता वाढवणे, मतपरिवर्तन करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचं आहे असं ते मानतात .पॅलटगन मध्ये जखमी झालेल्या १३५० मुलांवर डोळ्याची शस्रक्रिया केली ती मुलं मूळ प्रवाहात येतील अशी त्यांना खात्री वाटते. काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत अनेक संस्थांमधून त्यांचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी आपल्या समाजात जाऊन काम करावं अशी शिकवण ते देत असतात. श्री. अधिक कदम यांना कुपवाडा जिल्ह्यात तेथील स्थानिक त्यांच्या घरात गेली २५ वर्षे आश्रय देत आहेत. हा त्यांनी स्थानिकांमध्ये निर्माण केलेला विश्वास खुप मोलाचा आहे.